सोमवार, 28 जुलाई 2008

04- जलचिकित्सा

जलचिकित्सा
मंगळवार दि.18 फेब्रुवारी 1997
लेखांक 4.
This article was published in Gaokari, Nashik on 18 Feb 1997
Also see my Video on जलचिकित्सा -- Water therapy -- Video -- Hindi

निसर्गोपचारातील सुमारे तीस टक्के चिकित्सा पाण्याच्या वापरावर आधारित आहे. ब-याच जणांना यातील काही उपाय ऐकून माहीत असतील, ते म्हणजे पगस्नान, कटिस्नान, मणक्याचे स्नान, बाष्प स्नान, चादर स्नान, इत्यादी.

आपल्या जठरात जठराग्नी निर्माण होत असतो असे आयुर्वेदात म्हटले आहे तसेच योगावरील ग्रंथामध्ये शरीरात सहा ठिकाणी चक्रे असून प्रत्येक चक्रात थोडीफार ऊर्जा निर्माण होत असते असेही म्हटले आहे. पण आपण जाणतो की कोणत्याही मशीनमध्ये निर्माण होणारी उष्णता वापरण्यासाठी वेगवेगळ्या भागात गेली पाहिजे तसेच अनावश्यक उष्णतेचा निचरा देखील होत राहिला पाहिजे. तरच पुढची ऊर्जा निर्मितीची क्रिया नीट चालू राहू शकते. हीच उपमा शरीराला लागू आहे. निसर्गोपचारातील पाण्याचे उपचार हे उष्णतेचे नियमन करायला उपयोगी पडतात.

कटिस्नानासाठी एखादे घंगाळ किंवा टब घेऊन त्यात कमरेपासून मांड्यापर्यंतचा भाग पाण्यात राहील असे बसावे व हातांनी पोटावर सारखे पाणी उडवून चोळत रहावे ही क्रिया सांगितली आहे. ताप आला नसेल अशा व्यक्तीला दर तीन दिवसातून एकदा कटिस्नान दिले तर लठ्ठपणा, हायब्लड प्रेशर, बद्घकोष्ठता हृदयविकार, किडनीचा त्रास इत्यादी रोगावर आराम मिळतो.

पगस्नान म्हणजे थंड पाण्यात पाय किंवा कधी कधी हात बुडवून ठेवणे. आपले तळहात व तळपाय अतिशय संवेदनक्षम असून त्यांच्यावाटे शरीरातील उष्णता पटकन निघून जाऊ शकते. विशेषत: मेंदूतील निचरा न झालेली उष्णता कमी करण्यासाठी पगस्नान उत्तम आहे. म्हणून आपण बाहेरून आल्यावर किंवा झोपण्यापूर्वी हात पाय धुतो. त्यावेळी फक्त अर्धा एक मिनिट पाण्याचा स्पर्श करण्याऐवजी पाच सात मिनिटे हात पाय पाण्यात बुडवून ठेवले तर मेंदूला चांगला तरतरीतपणा येतो व टेन्शन किंवा तणावामुळे होणारे विकार टाळता येतात. जेवणाआधी हात पाय धुतल्याने तात्काळ पोटातील उष्णता त्यांच्या वाटे बाहेर जाऊ लागल्यामुळे भूक चांगली लागणे व अन्नाचे चांगले पचन होणे सुरू होते. यात महत्त्वाचा मुद्दा असा की लठ्ठपणा येण्याचे खरे कारण खाल्लेले अन्न नीट न पचणे किंवा शरीराला त्याची गरज नसणे हे असते. अन्न पचन व्यवस्थित होऊ लागल्यास जास्त खाण्याची प्रवृत्ती पण कमी होते.

बरेचदा थकवा जाण्यासाठी आपण गरम पाण्यात पाय बुडवून ठेवतो. अशा वेळी एक काळजी आवश्य घ्यावी. गरम पाण्याचा किंवा इतरही गरम उपचारांचा उपयोग थकवा घालवण्यासाठी फार चांगला होतो. उदाहरणार्थ बाष्पस्नान किंवा सोना-बाथ म्हणजे गरम हवेचे स्नान. मात्र अशावेळी डोक्यावर व कपाळावर एखादी थंड पाण्याची पट्टी अवश्य ठेवावी. अन्यथा मेंदूत पटकन उष्णता जाऊन डोके शिणून जाते. तसेच गरम पाण्याचा वापर करून कोणताही उपाय केल्यानंतर दहा-पंधरा मिनिटापासून दोन तासापर्यंत झोप अवश्य घ्यावी नाहीतर विनाकारण कृशता व दुबळेपणा निर्माण होतो.

मणका स्नान म्हणजे मणक्याच्या हाडाला थंडावा देण्यासाठी केलेला उपाय. एका लांब टब मधे उथळ पाण्यात पाठीवर झोपावे किंवा लाकडी बाकावर ओली चादर पसरून त्यावर झोपावे. दम्याच्या रोग्यांना याचा विशेष उपयोग होतो.

चादर स्नान, सोना बाथ किंवा बाष्प स्नान तसेच सूर्य स्नान यामागचा सिद्घांन्त थोडा वेगळा आहे. आपल्या शरीरातला कचरा ब-याचदा इतक्या सूक्ष्म स्वरूपात शरीरात साठून रहातो की, साधारण उपायांनी तो निघत नाही. आपल्या त्वचेवर असंख्य लोमकूप किंवा भोक असतात. याच्यातून घामाव्दारे काही कचरा बाहेर निघत असतो. याच क्रियेला जास्त प्रभावी करण्यासाठी चादर स्नान हा उपाय केला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओल्या चादरीत गुंडाळायचे नंतर त्यावर दोन तीन गरम घोंगड्या गुंडाळून थंडी किंवा वारा बाधणार नाही अशा बेताने झेपावून ठेवायचे. सुमारे तीस चाळीस मिनिटात चांगला घाम येतो. तो पुसून काढून कोरडे कपडे घालावेत. मात्र घाम येण्याऐवजी झोप लागली तर झोप संपल्यानंतर कोरडे कपडे घालावेत. या प्रकारामुळे मेंदुला अत्यंत शांतपणा मिळून तरतरी येते. त्वचेचे कित्येक रोग बरे होतात. ऍलर्जीवर तर हे फार परिणामकारक ठरते. तसेच किडनीच्या रोगांवरही उपयोगी आहे. गांधीजींनी निसर्गोपचाराचे बरेच प्रयोग स्वत:वर करून पाहिले. त्यात मुलाचा मोठा विषमज्वर चादर स्नानाने कमी झाला व नंतर पूर्ण बरा झाला असा अनुभव त्यांनी लिहून ठेवला आहे.

आपणही ताप आला की घाम येऊन ताप उतरावा यासाठी इतर उपाय करतोच. त्यामध्ये दोन-तीन चादरी लपेटून पडून राहणे, पारिजात आणि तुळशीची पाने एकत्र करून खाणे, गवती चहाचा काढा घेणे, ऍनल्जिन किंवा त्रिभुवन कीर्ती सारखी औषधे घेणे इत्यादी प्रयोग आपण करतोच. त्यापेक्षा चादर स्नानाचे महत्त्व जास्त अशासाठी की पाण्याच्या धुवून काढण्याच्या गुणांमुळे संपूर्ण शरीरातील लोमकूप जास्त चांगले मोकळे होऊन सूक्ष्म कचरा जास्त चांगल्या प्रकारे बाहेर पडतो. तरीही आपल्याला ऐन तापात चादर स्नान नको असे वाटत असेल तर एरवीच दर महिन्यातून एकदा चादर स्नान घेत रहायला हरकत नसते.

या चादर स्नानाऐवजी सूर्यस्नान म्हणजे याच प्रकारे अंगावर काळी घोंगडी लपेटून सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धातास निजून रहाणे, किंवा सोना बाथ म्हणजे जिथली हवा खूप गरम केलेली आहे अशा खोलीत अर्धा तास बसणे किंवा बाष्पस्नान म्हणजे वाफ भरलेल्या खोलीत बसून रहाणे किंवा माती स्नान म्हणजे सर्वांगावर मातीचा लेप देऊन अर्धा तास कोवळ्या उन्हात निजून रहाणे, असे बरेचसे गरम उपाय पण करता येतात. पण या सगळ्यापूर्वी एक महत्त्वाची काळजी घ्यावी ती ही की आधी तीन चार पेले पाणी प्यावे तसेच डोक्याला साध्या पाण्याने गच्च ओला केलेला टॉवेल गुंडाळून शिवाय गरज पडल्यास त्यावर पाण्याची धार ओतत रहावी. यापैकी माती स्नानाने त्वचेवर एक विशेष प्रकारची कांती येते. मातीस्नानात सुद्घा लाल मातीचे, काळ्या मातीचे, नदीकाठच्या मातीचे, पांढ-या मातीचे किंवा पिवळ्या मातीचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात. आतातर अगदी ब्यूटीपार्लर मध्ये सुद्घा मातीचे फेशियल अगदी जाहिरात देऊन केले जाते. मात्र वेगवेगळ्या त-हेच्या मातीमुळे नेमका काय वेगळेपणा येतो याबद्दल विशेष लिहिले गेलेले नाही किंवा एकूणच रोगाच्या चिकित्सेमध्ये मातीचा नेमका कसा वापर करावा यावर फारशी पुस्तके नाहीत. मात्र महात्मा गांधींचे एक व ‘माती नव्हे सोने’ (लेखक : सरोदे, बीड) अशी दोन चांगली पुस्तके माझ्या वाचनात आली आहेत.

--- XXX ---
kept mangal files on nity_leela
javascript:void(0)
पोस्ट प्रकाशित करें

06- उपवास -- Fasting thrapy

उपवास

Also see my Video on उपवास -- fasting therapy -- Video -- Hindi
मंगळवार दि. 4 मार्च, 1997 गावकरी, लेखांक 6.


निसर्गोपचारातील उपाय वापरण्याचे माझे ठोकताळे आहेत. यात पाण्याच्या उपचारांबरोबरच उपवास, आहार व नैसगिक आहार याचा जाणीवपूर्वक उपयोग केल्यास फार फायदा होतो. उपवासाचा उपयोग नेमका कसा होतो याबद्दल काही अनुभव सांगते.

आपण खाल्लेल्या अन्नातून शरीराला पोषक द्रव्य शोधून घेतल्यानंतर उरलेला कचरा शरीरातून बाहेर टाकला जातो. पण ही क्रिया पूर्ण कार्यक्षमपणे कधीच पार पाडली जात नाही. थोडा फार स्थूल कचरा आतड्यांमध्ये साठून राहतोच. कालांतराने तो कुजतही जातो. त्यातून इतर विषारी द्रव्यांची किंवा सूक्ष्म कच-याची निर्मिती होऊन ते देखील शरीरात पसरतात व कुठेही साचूनही राहतात. सूक्ष्म कच-याच्या साठण्याच्या जागा म्हणजे रक्तात हाडांच्या संधीच्या ठिकाणी त्वचेच्या खाली इत्यादी पण त्यातूनही सूक्ष्मतम कचरा निर्माण होऊन तो आपले मन बुध्दी व स्वभाव यांच्यावर परिणाम करु लागतो. यामुळे हार्मोनल व शरीरातील बरेचसे दीर्घ मुदतीचे रोग होतात. यामध्ये कोष्ठबध्दता, अस्थमा, रक्तदाब. हृदयरोग, मनोविकार, डायबिटिस, संधिवात, स्थ्‌ूलपणा, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, अर्धशिशी अशी बरीच नावे आपण ऐकतो.

शरीराचे काम करण्याचे जे नियम ठरलेले आहेत त्यामध्ये अन्नपचनाला सर्वात जास्त प्राधान्य व तातडीचा क्रमांक दिला आहे. आपण जितक्यांदा अन्नग्रहण करतो तितक्यांदा उर्जेचा प्रवाह पाचनसंस्थेकडे वळवला जाऊन शरीराच्या इतर व्यवहारांना कमी ऊर्जेचा साठा मिळतो. तसेच अन्नात शरीराला निरुपयोगी घटक जितके जास्त तितकी ऊर्जा अन्नपचनाऐवजी मल विसर्जनाकडे जास्त वळवावी लागते. भूक नसतांना खाणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाण्याने पण हेच होते. पचनसंस्थेसाठी मिळालेल्या एकूण ऊर्जेपैकी प्रत्यक्ष पचन व शरीरात त्याचे ग्रहण होणे यासाठी ऊर्जा मिळते व जास्त ऊर्जा मलविसर्जनासाठी वाया जाते. यावरुन हेही लक्षात येईल की आपण जे काही खातो त्याचे पचन किती चांगले झाले व त्यातून निर्माण झालेल्या रसांचे ग्रहण शरीरात किती चांगले झाले यावर आपले आरोग्य जास्त अवलंबून असते.

एकदा ससूनमधील एक सर्जन आपला अनुभव सांगत होते. त्यांना चामड्याचे बरेच विकार होऊ लागले. इतर सर्व प्रकारच्या औषधांना वैतागून शेवटी ते दहा दिवस उरळी कांचनच्या निसर्गोचार आश्रमात जाऊन राहिले. कडक इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी दहा दिवस उपवार आणि तिथले निसर्गवैद्य सांगतील तसे सर्व काही केले. या काळात त्यांना चार वेळा एनिमा पण देण्यात आला. शेवटच्या म्हणजे दहाव्या दिवशी दिलेल्या एनिमानंतर पोटातून बरीच काळी उग्र वासाची घाण बाहेर पडली. त्यांचेच शब्द सांगायचे तर दहा दिवस उपवास करून एवढी घाण पोटात राहिलेली असू शकते हेच आधी कुणाला पटलं नसतं. यानंतर त्यांचे चामड्याचे विकार जादूसारखे नाहीसे झाले. अतिशय शांत झोप येऊ लागली. विद्यार्थी काळापासून अभ्यासात जे धडे समजले नव्हते ते आठवून आठवून त्यांची उत्तरं सुचायला लागली. माईल्ड डोकेदुखी असायची ती पूर्ण बंद झाली वगैरे मात्र तेवढी पोटातली घाण बाहेर पडून जाण्यासाठी दहा दिवस उपास करून अन्नपचनाची लागणारी शरीराची पूर्ण ऊर्जा या एका कामाकडे वळवावी लागली.

दिल्लीतील माझ्या माहितीच्या एका वृध्द निसर्ग-वैद्यांचा मी पाहिलेला अनुभव. त्यांना स्कूटर ऍक्सीडेंट होऊन पायाला जबर जखम झाली. तिस-या दिवशी मी त्यांना भेटायला गेले. जखमेवर फक्त ओल्या पाण्याच्या घड्या ठेवल्या होत्या. ते त्या घड्या अर्ध्या तासाने बदलत होते. मात्र जखमेत पू वगैरे काही झालेला दिसत नव्हता. त्यांनी ऍक्सीडेंट झाल्यापासून लगेचच उपवास सुरू केला होता. हेतू हा की अन्नपचनासाठी शरीराची ऊर्जा वापरली जाऊ नये. त्या ऊर्जेचा प्रवाह जखमेकडे वळून जखम नीट व्हावी. त्यांनी हा उपवार दहा दिवस ठेवला होता व औषधाविना आणि सेप्टिक न होता जखम बरी झाली.

आपण खूप बडबड करून पण आपली शक्ती दवडत असतो. मी दहा दिवस विपश्यना आश्रमात गेले तिथला अनुभव पण महत्व्वाचा आहे. तिथे सकाळ संध्याकाळ नाश्ता व दुपारी मोजके जेवण एवढेच देतात. संपूर्ण मौन पाळायला सांगतात. पहिले तीन दिवस आनपान हा प्रकार शिकवून चौथ्या दिवशी ध्यान शिकवायला सुरूवात केली. त्याबरोबर माझी भूक थांबली. दिवसभरात एक चमचा मुरमुरे व दोन घोट पाणी हेही अन्न मला जास्त वाटू लागले. यावरून असे लक्षात येते की आपण गरजेपेक्षा ख्‌ूपच जास्त अन्न खात असतो ते खाऊ नये.

निसर्गोपचारात उपचार करताना खूप पाणी प्या असे सांगतात. माझा अनुभव असा आहे की पाणी पिऊन उपास व निर्जल उपवास याचे परिणाम वेगवेगळे होतात. जर्मनीत निर्जल उपवासाबद्दल फक्त स्क्रॉच या जर्मन वैद्याने काही अनुभव लिहून ठेवले आहेत. आपल्याकडे निर्जला उपवासांची पध्दत आहेच. त्यावरून दिशा घेऊन मी हे प्रयोग करुन बघितले. माझा निष्कर्ष असा की ताप, डिसेंट्री, उलट्या इत्यादीसाठी पाणी भरपूर प्यावे मात्र साचलेल्या रोगांसाठी उपास करीत असल्यास सुरुवातीचे काही वास किंवा दिवस वगळता एरवी पाणी देखील वर्ज्य करावे. मात्र या पध्दतीने या उपायांना दाद देत असते असे वेगवेगळे अनुभव कुणीतरी संकलित करुन ठेवल्यास त्यातून इतरांना उत्तम मार्गदर्शन होऊ शकते.

निसर्गोपचार करण्यासाठी प्रॅक्टीसला महत्व आहे. आपल्याला कार चालवायची असेल तेव्हा गियर, ब्रेक, क्लच इत्यादींचे सैध्दान्तिक ज्ञान डोक्यात असून उपयोग नसतो. मेंदूने विचार करू लागण्याआधीच आपल्या हातापायांनी ब्रेक, क्लच, गियर, हॉर्न इत्यादी वापरले तरच ते मुरलेला ड्रायव्हर. अशीच प्रॅक्टीस निसर्गोपचार करण्यासाठीसुध्दा लागते. खरं तर जीवनात सगळ्यात बाबीत हा सहजपणा येणं महत्वाचं असतं.
-----------------------------------------------------------------------------------------

09- शरीरातल्या ‘कच-याची’ विल्हेवाट लावण्यासाठी...-- For disposing the waste and toxins

शरीरातल्या ‘कच-याची’ विल्हेवाट लावण्यासाठी...
मंगळवार दि. 1 एप्रिल, 1997 गावकरी लेखांक 9.

शरीरातील कचरा जेव्हा मलमूत्र, घाम व उच्छवास यावाटे कार्यक्षमतेने निघून जात नाही तेव्हा काय होते ? शरीर स्वत:च जाणीवपूर्वक काही वेगळे उपाय शोधू लागते. यामुळे अनुक्रमे जुलाब व उलटी, ताप येणे, त्वचेचे रोग, श्र्वासाचे रोग इत्यादी होऊ लागतात. अशा प्रक्रिययेला थांबवण्याचा किंवा दमन करायचा प्रयत्न करण्याऐवजी वेगळे पर्याय आहेत. होमियापॅथीचा पर्याय असा की शरीराने देहशुद्घीचा निवडलेला नवा मार्ग बरोबर असून त्याच मार्गाने पूर्ण निचरा होऊन जाऊ द्या. यासाठी जे औषध देण्यात येते त्याने सुरूवातीला मूळ रोगाची लक्षणे वाढू लागतात व मगच थांबतात असे आपण बघतो.

निसर्गोपचारात देखील लक्षण - विरोधी औषध दिले जात नाही पण नैसर्गिक प्रक्रिया मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. आयुर्वेदातील शमन चिकित्सेत लक्षणांविरूद्घ अतिशय सौम्य व बहुधा आपल्या मसाल्यांतील गोष्टी किंवा घराभोवतालच्या क्षुल्लक वनस्पतींचा वापर केला जातो. बाराक्षार चिकित्सा पद्घतीत लक्षणावरून शरीराची क्षारांची गरज ओळखून तेवढेच क्षार सूक्ष्मप्रमाणात दिले जाते. याउलट ऍलोपथी किंवा आयुर्वेदातील दमन चिकित्सेमध्ये लक्षणांवर तात्काळ दाबून टाकणारे औषध आधी दिले जाते. याचा अर्थ शरीराला जो कचरा बाहेर काढायचा होता तो निघण्याचा मार्ग आपण तात्पुरता थांबवला. ही झाली इमर्जन्सी मॅनेजमेंट. खरे तर ती तशी करण्याची गरज आहे काय हेही जाणीवपूर्वक ठरवायला हवे. यासाठी रोगी व डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवादही हवा. पण यामुळे रोग बरा झाला असे समजून आपण शरीरात दाबून टाकलेला कचरा निघून जाण्यासाठी पुढे काहीच केले नाही व शरीरालाही ते नैसर्गिक प्रक्रियेतून जमले नाही, तर हे दाबून ठेवलेले रोग पुढे इतर उग्र रोगात बदलतात. यासाठी तसेच दमन चिकित्सेतील उग्र औषधांचं इतर दुष्पपरिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदात पथ्य योजना करावी लागते म्हणून पुन्हा ती चिकित्सा किचकट व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची ठरते.

...2/-

- 2 -
शरीरात साठलेल्या कच-यातून टॉक्सिसिटी किंवा सूक्ष्म कच-यांची निर्मिती होऊन दीर्घकालीन आजार, उदाहरणार्थ संधिवात, स्पाण्डिलायसिस दमा, डायबेटिस इत्यादी होतात असा निसर्गोपचाराचा सिध्दांत आहे. तर मग हा साठलेला सूक्ष्म कचरा केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा किंवा जसा टप्प्याटप्प्याने हा साठत गेला त्याच्या मधल्या स्टेजचे केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा, असा प्रश्न विचारला तर असले काही प्रयोग कुणी निसर्गोपचारक करून दाखवू शकणार नाहीख् मात्र कचरा काढायचे उपाय करत राहिल्याने हे रोग बरे होतात असा निष्कर्ष कित्येक ब-या केलेल्या रोग्यांच्या आधारे निघू शकतो. त्यामुळे मी वर केलेल्या एकूण सैद्घान्तिक विवेचनाच्या जोडीला रोग्याबाबतची केस हिस्टरी ठेवून व शास्त्रशुद्घ रीतीने प्रयोग करून काय निष्कर्ष निघतात ते तपासण्याची गरज आहे. असे शास्त्रशुद्घ प्रयोग करणे त्यांची हिस्टरी ठेवणे, त्यांच्या निष्कर्षाची चर्चा व देवाण घेवाण करणे, थोडक्यात ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचे शास्त्र म्हणतात ते शास्त्र शिकून घेणे हेही आयुर्वेद किंवा निसर्गोपचाराच्या दृष्टीने गरजेचे आहे. तसेच देहशुद्घीचे निसर्गोपचारात प्रत्यक्ष केले जाणारे उपाय आयुर्वेदाचे चिकित्सक कधीच वापरून बघत नाहीत. फक्त त्यांच्या ग्रंथात या उपायांची माहिती किती चांगली, किती सुसूत्र व किती प्रदीर्घ मांडली आहे ते उतारे वाचून दाखवतात. त्यामुळे आयुर्वेद व निसर्गोपचार यात माझ्या मते फरक असा की निसर्गोपचार - स्वस्थवृत्त व शमन चिकित्सेपैकी थोडक्यात उपायांचे पुस्तकही ज्ञान पण प्रत्यक्ष वापर शंभर टक्के.

आयुर्वेद - स्वस्थवृत्त व शमन चिकित्सेचे भरपूर पुस्तकी ज्ञान पण प्रत्यक्ष वापर आणि अनुभव सिध्दी शून्य, त्याऐवजी दमन चिकित्सेवर भर ! मात्र आयुर्वेदातील फक्त शमन चिकित्सेचा शास्त्रोक्त वापर अतिशय कौशल्याने करणारे सुमारे हजार खाटांचे पुदुकोट्टई (केरळ) येथील पंचकर्म चिहकित्सालय मात्र मेडिकलच्या सर्वच शास्त्रांच्या जिज्ञासूंनी पहाण्यासारखे आहे, अशी माझी खास शिफारस आहे.

--- XXX ---

03- शाकाहाराचं महत्त्व.-- Merits of being vegetarian..

शाकाहाराचं महत्त्व...
मंगळवार दि. 11 फेब्रुवारी, 1997 गावकरी, लेखांक 3.

निसर्गोपचार असा शब्द आयुर्वेदात कोठेही वापरलेला नाही. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी ऍलोपथी पण आजच्या इतकी प्रगत नव्हती. ऍलोपथीला मेडिसिन्स सायन्स्‌ म्हणत असत. त्या काळात जर्मनीत ऍलोपॅथीतील औषधांना वैतागलेल्या ब-याच लोकांनी याशिवाय काही उपाय आहे का या प्रश्नातून सुरूवात केली. त्यांनी जे उपाय शोधले त्यात सर्वात प्रसिद्घ झाले लुई कुन्हे यांचे जलचिकित्सेचे प्रयोग. शिवाय इलेक्ट्रोपॅथी चुंबकचिकित्सा, माती चिकित्सा, सूर्यस्नान चिकित्सा याही गोष्टी प्रचलित झाल्या. आहारशास्त्रातही नवीन प्रयोग सुरू झाले. त्यामध्ये मांसाहाराचे दुष्पपरिणाम लक्षात आलेल्यांनी शाकाहाराची मोहीम सुरू केली. शाकाहाराची फार मोठी परंपरा भारतातही आहे व जगातील शाकाहारी लोकांची जास्तीत जास्त टक्केवारी भारतात आहे. पण त्याचा उगम नेमका कुठे ते सापडत नाही. आयुर्वेदात मांसाहार हा ठराविक रोगांनाच वर्ज्य सांगितला आहे. पण म्हणून त्याचा सरसकट प्रचार कुणी सुरू केला असेल तर तशी नोंद माझ्या माहितीत नाही. पण पुराण काळातले चार दाखले मला माहीत आहेत.
एकदा पृथ्वीवर खूप दुष्काळ पडला असता प्रजेने पार्वताची आळवणी केल्यावर तिने प्रसन्न होऊन असे सांगितले की, तुम्ही मांसाहार सोडावा. त्याऐवजी मी तुमच्यासाठी भरपूर शाकभाज्यांची निर्मिती करते ती तुम्ही खावी. हाच शाकंभरी देवीचा अवतार. तिथून पुढे शेतीला व शाकभाज्यांच्या उत्पादनला सुरूवात झाली, असे देवी भागवत सांगते. दुसरा दाखला आहे, पातंजली योगसूत्रांचा - त्यामध्ये योगाभ्यासाच्या सुरूवातीला जे पाच यम पाळायला सांगितले - म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि असंग्रह ज्ञ् त्यात अहिंसा सर्वप्रथम आहे. त्यामुळे परमयोगी म्हटलेल्या कृष्णाच्या भक्तीतून सुरू झालेला वैष्णव सांप्रदाय हा शाकाहारी ! या कथेखेरीज दुस-या कथांमधील गणपती हा गजवदन असल्याने शाकाहारी तर दत्तात्रेय हाही शाकाहारी अशा प्रकारे विविध धार्मिक सांप्रदायातून शाकाहाराची परंपरा आली. भगवान महावीर व भगवान बुद्घ यांनी पण अहिंसा व करूणेचा महिमा गात यज्ञातून चाललेली बळीची प्रथा बंद केली. यापैकी जैनांनी पूर्णपणे तर बुद्घधर्मियांनी पण मोठ्या प्रमाणावर मांसाहार वर्ज्य केला. या पुराणकथांखेरीज थोड्या आधुनिक काळात खास पर्यावरण रक्षणासाठी, निदान हरीण, मोर यासारख्या प्राण्यांच्या रक्षणासाठी पिढ्यान पिढ्या मांसाहार न करण्यासाठी प्रतिज्ञा घेतलेल्या बिशनोईसारख्या काही पोटजाती राजस्थान, हरियाणा प्रांतात आढळतात. चातुर्मासात मांसाहार न करण्याची पद्घत देशात खूप ठिकाणी आहे. तसेच पंढरपूरची माळ घेतली तरी लोक मांसाहार सोडतात, ही वारकरी परंपरा सात-आठशे वर्षापूर्वीची आहे.
एकूण काय तर शाकाहाराची परंपरा निर्माण होण्यामध्ये धर्म, पर्यावरण व आरोग्य शास्त्र या तीनही विचारांनी हातभार लावलेला आहे इथे थोडे विषयांतर करून सांगायला हरकत नाही की लिओ टॉलस्टाय यांनी मानवधर्माचा एक आवश्यक सिद्घांत म्हणून म्हणजेच पुन्हा करूणा या मुद्दातून शाकाहाराचा विचार रशियात मोठ्या प्रमाणावर मांडला. निसर्गोपचारामध्ये तर शाकाहार हा मस्ट मानला गेला आहे. त्यासाठी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा दाखलाही आहे. जर माणसाचे पूर्वज माकड हे शाकाहारी आहे तर प्रकृतीने माणसालासुद्घा शाकाहारी केले असावे. शिवाय शरीरशास्त्राचा दाखला आहे - आपल्या संपूर्ण अन्नमार्गाची म्हणजे तोंडापासून तर मोठ्या आतडीच्या शेवटच्या टोकापर्यंत लांबी मोेजली व तिची रचना पाहिली तर ती शाकाहाराच्या पचनाला उपयुक्त आहे, पण मांसाहाराच्या पचनाला उपयुक्त नाही. यावरूनही माणसाने शाकाहारी असले पाहिजे. मांसाहार केल्यास शरीराला अन्न म्हणून कमी उपयोगाचा पण कचरा म्हणून जास्त त्रासाचा ठरतो आणि तो कचरा काढून टाकण्यासाठी शरीराला जास्त परिश्रम घ्यावे लागतात, इत्यादी बरीच कारणे निसर्गोपचारात सांगितली आहेत.
सुमारे दीडशे वर्षापूर्वी जर्मनीतल्याच जुस्ट या माणसाचे रिटर्न टू नेचर हेही पुस्तक खूप गाजले. त्यातूनच पुढे नेचरोपॅथी हा शब्द उदयाला आला. त्यात त्यांनी पाणी, माती, ऊन निसर्गात मुक्त संचार व आहारातील संयम या उपायांवर भर दिला व कृत्रिम अन्नाचा वापर तसेच औषधांचा वापर का वा कसा टाळता येईल त्याबाबतचे मत मांडले. म्हणून आज असे म्हणता येईल की, जर्मनीमधला निसर्गोपचार म्हणजे पाणी, माती, सूर्य व आहार नियमन या उपायांनी केलेला उपचार.
जर्मनीतील हे उपचार अमेरिकेत गेले तेव्हा दोन गट पडले. एका गटाने संपूर्णपणे आहार नियमनावरच भर दिला. ते स्वत:ची शैली हीच प्युअर नँचरोपॅथी असे मानतात. याउलट काहींनी आहार, माती, पाणी, ऊन, चुंबक, इलेक्ट्रो, ऍक्युप्रेशर, ऍक्युपक्चर, फेथहिलिंग रेकी वगैरे सर्व बाबींचा त्यात समावेश केला. मात्र आयुर्वेद व होमिओपॅथी सोडून आयुर्वेद त्यांना माहीत नव्हते, म्हणून तर होमिओपॅथीमध्ये औषध देतात.
जर्मन पुस्तकातील हे आधुनिक विचार भारतात आले, ते लक्ष्मण शर्मा, महात्मा गांधी इत्यादींच्या प्रयत्नातून भारतातून आल्याबरोबर या विचारांना आयुर्वेदातील कित्येक, विचार व परंपरा जोडता येणे शक्य आहे हे ब-याच जणांना कळून आले, तसा दोन्ही शास्त्रांची सांगड घालून वापरही होऊ लागला. अशी सांगड घातलेलं एक अप्रतिम पुस्तक म्हणजे धन्वंतरी या आयुर्वेदिक मासिकाने सन 1966 मध्ये गंगाप्रसाद नाहर गौड या लेखकाचा प्राकृतिक चिकित्सा नावाने प्रसिद्घ केलेला अंक !
मात्र दुदैवाने आजून एक गोष्ट घडली ही परदेशातून आलेली नेचरोपॅथी शिकून प्रॅक्टिस करू पाहणा-या लोकांकडे वैद्यकशास्त्र डिग्री नसल्याने आयुर्वेद व ऍलोपॅथी दोन्हीतील डॉक्टर त्यांना मान्यता किंवा सन्मान देईनात. पैकी ऍलोपॅथी डॉक्टरांनी दाखविलेली उपेक्षा कोणी फारशी मनावर घेतली नाही, कारण त्या प्रवृत्तीशी लढा भारताबाहेर जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेमध्येही चालला आहेच. पण ऍलोपॅथीने उपेक्षा केलेल्या वैद्यांनीही आपल्याला मान्यता देऊ नये याचे मोठे वैषम्य वाटू लागले. त्यामुळे आम्ही जे उपचार करतो ते आयुर्वेदापेक्षा किती वेगळे आहेत हे सिद्घ करण्यातच त्यांची शक्ती वाया जाऊ लागली. तिकडे आयुर्वेदाबाबत बोलायचे झाले तर त्यात सांगितलेल्या पंचकर्म वगैरे पद्घती किंवा शमन चिकित्सेतील इतर सिद्घांत पद्घतशीरपणे किंवा नेमकेपणाने वापरून फक्त त्यातूनच रोग बरा करू शकणारा वैद्य आयुर्वेदात नाही. वैद्य म्हटला की तो दमन चिकित्सेचा वापर हमखास करणारच. एवढेच नाही तर ही दमन चिकित्सा शास्त्रोक्त पद्घतीने न शिकलेल्या निसर्गोपचारकांची तो उपेक्षा करणार. अशा प्रकारे आयुर्वेद विरूद्घ निसर्गोपचार या वादांमुळे दोन्ही पद्घतीचे नुकसान होत आहे.
तसे पाहिले तर आपल्याकडे डॉक्टरी पेशातील प्रत्येक शाखेतीलच ही वृत्ती बळावली आहे की माझे ज्ञान श्रेष्ठ व तुझे चांगले असले तरी मी ते शिकणार नाही व माझ्या रोग्यांसाठी तर वापरणारच नाहीच नाही, या वृत्तीमुळे आपल्याकडील खरे तर कोणताच डॉक्टर होत नाही, तो चांगले रिसर्च देखील करू शकत नाही. केंद्र शासनाने प्रत्येक शाखेत एक एक रिसर्च इन्स्टिट्यूट निर्माण केली आहे. ऍलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी व योग अशा सहा शाखांमधल्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. मात्र जयपूर फूटसारखा एका प्रायव्हेट डॉक्टरने केलेला अनोखा आविष्कार वगळता आपल्या देशात एकही मोठा यशदायक आविष्कार घडलेला नाही. याचं अर्ध कारण आपल्यां निरक्षर, अज्ञानी समाजात आहे, कारण ही मंडळी स्वत:च्या आरोग्याबाबत विचार करू शकत नाहीत व पूर्णपणे परावलंबी असतात. त्यांच्यात शिकून घेणे ही प्रवृत्ती वाढवली तर त्यांना निसर्गोपचार व इतर आरोग्य पद्घती तारतम्याने कळूंन येतील.
--- XXX ---
kept mangal files on nity_leela

11- पाणी पिण्याच्या विविध पद्घती -- The science of drinking water

पाणी पिण्याच्या विविध पद्घती
मंगळवार दि. 15 एप्रिल, 1997 गावकरी लेखांक 11.
पाणी पिणे ही तशी साधी गोष्ट. पण आपण त्याच्याबद्दल जाणीव ठेवली तर यामधूनही आपल्याला एक तंत्र किंवा पद्घत निर्माण करता येते.
ताप येणे ही सध्या कोणत्याही मोठ्या शहरात सातत्याने होणारी गोष्ट होऊन बसली आहे. एक साथसदृश्य परिस्थिती आहे त्याचे निदान ‘व्हायरल फिवर’ असे केले जाते. खूप लोकांना एकदम ताप येतो. पहिल्याच दिवसापासून ऍन्टिबायोटिक द्यायला डॉक्टर सुद्घा तयार नसतात.
अशा वेळी घोटा-घोटाने तीन-चार पेले पाणी पीत राहिल्याने निश्चित फायदा होतो. शिवाय ज्यांना बाराक्षार औषधांची माहिती आहे त्यांनी हेही करून पहावे.
फेरम फॉस (ताप कमी होण्यासाठी ), नेट्रम सल्फ (छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी), नेट्रम मूर (अंगदुखी कमी करण्यासाठी), काली मूर (टोनिंगसाठी) व काली फॉस (शांत झोप किंवा मन शांत होण्यासाठी) या सर्वांच्या 6x पोटेन्सीच्या दहा दहा गोळ्या पेलाभर कढत पाण्यात टाकून ते मिश्रण थंड करून घोट-घोट प्यायचे. (वरील गोळ्यांचे प्रमाण कमी-जास्त करता यावे म्हणून अशा तापाच्या संदर्भातले त्याचे नेमके कार्य वर सांगितले आहे. एरवी इतर खूप रोगात त्यांचा वापर करतातच.) याशिवाय पारिजातकाची दोन पाने, तुळशीची दहा पाने, थोडे ओले खोबरे आणि खडीसाखर असा विडा लावून दर तीन / चार तासांनी एकदा खाणे हाही माझा ठेवणीतला उपाय आहे. ज्यांना पानं शोधणं कटकट वाटते ते म्हणतील सरळ पारिजातवटी का नाही घेत ? पण मी तसे करत नाही एवढे खरे !

तुळशीच्या पानांचा अनुभव...

आता पुन: पाण्याकडे वळू या. आयुर्वेदात सूक्ष्म वनस्पतीशास्त्र असा एक प्रकार आहे. त्याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील एक वैद्य श्री. परांजपे यांनी बराच अभ्यास केला. (त्यांचे एक पुस्तकही आहे ‘संजीवनी चिकित्सा’) हे शास्त्र असे सांगते की शरीराला बरे करण्यासाठी वनस्पतींची फार मोठी मात्रा आवश्यक नसून अत्यंत सूक्ष्म अवस्थेत व फार थोडी मात्रा देऊन चालते. याची प्रचिती घेण्यासाठी मी एक प्रयोग केला की औषध म्हणून तुळशींची पाने खावी, असे ज्याप्रसंगी वाटत होते त्यावेळी तुळशीची पाने दोन तास पेलाभर पाण्यात बुडवून मग ते पाणी प्यायचे. याने पण अपेक्षित फायदा झाला. पण हे तंत्र वारंवार वापरून, त्याच्या नोंदी ठेवून, चर्चा करून मगच त्याचा शास्त्र म्हणून उपयोग करता येईल. असाच एक प्रयोग दूर्वांबाबत केला. दूर्वेचे पोषण-मूल्य खूप असते. अन्न मिळत नाही अशावेळी काही आदिवासी दूर्वेची मुळं खातात, असे ऐकल्यावरून आपणही अन्न न खाता दूर्वा खायच्या असे ठरवले. पण त्या अतिशय चरबरीत लागतात व जीभ सोलली जाऊ शकते. म्हणून थोडेसे ठेचून मऊ केलेली दुर्वांची एक जुडी वापरली. ती दोन तास पाण्यात ठेवायची व नंतर दुस-या पेल्यात टाकून ते पाणी तयार करायला घ्यायचे, व तोपर्यंत पहिले पाणी प्यायचे. यामुळे खरोखर दोन दिवस भूक लागली नाही. पण हेही कुणी मोठ्या प्रमाणावर करून पाहिले तर त्याला ‘सिद्घता’ येणार.

आपल्या रोजच्या दिनक्रमात सकाळी उठून चूळ न भरताच पाणी प्यावे, ही आयुर्वेदात उष:पान पद्घत सांगितली आहे. त्याचा खूप फायदा होतो. पण किती पाणी प्यावे याबाबत एकमत नाही. भरपूर जुनी कोष्ठबद्घता असताना रोज तीन पेले पाणी पिण्याने पंधरा दिवसात ती बरी झाली, असा अनुभव मी नुकताच ऐकला. पण आता बरे झाल्यावर त्यांनी पाण्याची मात्रा कमी करून एक पेल्यावर आणावी काय? कारण विनाकारण जास्त पाणी पिण्याने शरीराला त्याच्याही ‘पचनाची’ जबाबदारी पूर्ण करावीच लागते. याहीबाबत चर्चा गरजेची आहे.

माठातलं... तांब्याच्या घागरीतलं... पाणी

मी स्वत: रोज सकाळी पेलाभर पाणी पिते. त्याने तरतरी येते असा अनुभव आहे. विशेषत: रात्री बाराच्या पुढे जागरण झाले असेल तर दुपारपर्यंत फक्त साधे पाणी प्यावे व गरम चहा, कॉफी किंवा कोंबट पाणी अगर दूध कटाक्षाने टाळावे, यामुळे मेंदूची विश्रांतीची गरज लवकर भागते. याशिवाय थंड पाण्याने आंघोळ किंवा निदान डोक्यावर तरी फक्त थंडच पाणी घेतल्याने सुद्घा जागरणाचा शीण पटकन जातो. महाराष्ट्रात मुलींनी आठवड्यातून एकदाच डोके धुवायची पद्घत आहे. त्याऐवजी डोके रोज धुवावे. रोज शाम्पू, साबण, शिकेकाई लावू नये पण पाणी मात्र डोक्यावरून रोज घ्यावे, असा माझा अनुभव सांगतो.

खूप लोक, विनाकारण अतिथंड पाणी पितात. पण त्याने लहान भागत नाही व त्यातून मिळणारी तृप्ती पण मिळत नाही. उन्हाळ्यात मातीच्या माठातले पाणी चांगले. बरेच वेळी पिण्याचे पाणी शुद्घीकरणासाठी त्यांत ब्लिचिंग पावडर टाकलेली असते. तो क्लोरिनचा वास लवकरात लवकर निघून जाण्यासाठी माठासारखा चांगला उपाय नाही. तांब्याचा स्वत:च निर्जंतुकीकरणाचा गुण आहे. शिवाय पाण्यातले ज्यादा व वास मारणारे क्लोरिन, सूक्ष्म गाळ इत्यादींना खाली बसवण्याचा गुण पण आहे. त्यामुळे पाणी गाळा, उकळा असे उपाय रोजच्या रोज न करता फक्त शहरात मोठी साथ असेल व पाणी फार गढूळ येईल तेव्हाच आम्ही करतो. नुकतेच पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींनी तपासणी करून शरीराची रोगप्रतिकारकता टिकवण्यासाठी मिनरल वॉटर, फिल्टर, उकळणे इत्यादी उपाय कुचकामी असल्याचा निष्कर्ष काढला आहे. हा प्रयोग व निष्कर्ष लंडनच्या लॅन्सेट या आरोग्यावरील अधिकारी मासिकाने प्रसिद्घ केला असून तो मुळातून वाचण्यासारखा आहे.
तांबे, पंचधातू, चांदी-सोन्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवून सकाळी उठताच ते पाणी प्यावे, असे आयुर्वेदात म्हटले आहे. सोन्याचा उपयोग हृदयविकार, सांधिवात व नर्व्हस सिस्टमसाठी तर चांदीचा उपयोग डोळ्यांसाठी फार चांगला असे म्हणतात. पैकी चांदीच्या भांड्यातील पाण्याची प्रचितो आम्ही कित्येकदा घेतली आहे.

उन्हाळ्यात आपण माठातले किंवा फ्रिजचे थंड पाणी पितोच. त्यात खायच्या कापराची वडी, वाळा किंवा दुर्वांची जुडी किंवा मोग-याचे एक फूल किंवा तुळस असे काही टाकून त्याची देखील चव वाढते व उन्हाळा बाधत नाही.

निसर्गोपचाराचा भारतात ज्यांनी मोठा प्रचार केला त्या लक्ष्मणशास्त्री शर्मांचे प्राकृतिक चिकित्सेवर अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. पुण्यांतील राष्ट्रीय प्रकृतिक चिकित्सा संस्थानच्या संग्रहांत हे पुस्तक आहे. त्यांत घोट घोट पाणी पिण्याची पद्घत सांगितली आहे. एक पेला पाणी पिण्याला अर्धा तास लावायचा. एका वेळी फक्त अर्धा चमचा किंवा आचमनाच्या पळीएवढेच पाणी प्यायचे. असे दिवसात तीन वेळा करायचे. ज्या कारणांसाठी आपण शंकराच्या मस्तकावर थेंब थेंब पाण्याची संततधार धरतो, एकदम घागर उपडी करत नाही व संततधारेमुळे जसा हलाहलाचा दाह कमी होतो, तसा पोटातील दाह कमी होण्यासाठी हा उपाय असल्याने, आम्लपित व अल्सरचा त्रास असलेल्यांना याचा विशेष फायदा होतो.

आणि थोडेसे पाणी न पिण्याबद्दल ! खूपदा आपल्याला तहान लागते पण जवळ पाणी नसते. विशेषत: मराठववाड्यामध्ये दौरे करताना, रेल्वे प्रवासात, राजस्थानातील ट्रिप्समध्ये व हिमालयातील ट्रेकिंगमध्ये मला हा अनुभव आला. ट्रॅव्हल लाईटच्या नादामुळे पिण्याचे पाणी हे मी अनावश्यक सामान मानते व जवळ बाळगत नाही. मिळेल त्या गावातले पाणी पिते. पण तेही मिळालेच नाही तर ? यासाठी शीतली प्राणायम हा एक उत्तम उपाय आहे. ओठांचा चंबू करून जिभेचे टोक वरच्या ओठाला लावायचे व हळूहळू हवा आत ओढत तोंडाने श्र्वास घ्यायचा. नंतर लगेच ओठ मिटून नाकाने श्र्वास बाहेर सोडायचा. असे दहापंधरा वेळा करायचे. म्हणजे तहान भागते. ही ट्रिक मी खूपदा वापरली. असे म्हणतात की पक्ष्यांना उन्हाळ्यात दुपारी पाणी मिळत नाही; तेव्हा ते देखील हाच उपाय करतात.

--- XXX ---

(छोटा) भाग-12 आपल्या आरोग्यासाठी केवळ पाच मिनिटं...

भाग-? आपल्या आरोग्यासाठी केवळ पाच मिनिटं...गांवकरीतील लेख

कळते पण कळत नाही ही उक्ती ब-याच जणांना लागू होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे आरोग्याबाबत आपण दाखवतो तो आळशीपणा. रोज आसने करावीत, व्यायाम करावा, फिरायला जावे वगैरे आपण वाचतो, मनाशी ठरवतो पण त्याप्रमाणे वागत मात्र नाही. माझा स्वत:चा याबाबतचा अनुभव अतिशय वाईट आहे. नियमित अर्धा तास व्यायाम करायला मला जमत नाही. मग माझ्यासारख्या माणसांना ‘गती’ काय?
यावर मी स्वत:साठी जे काही उपाय करते ते इतर कित्येकांना उपयोगी पडतील असे वाटते. यात मी असे गृहित धरले आहे की, मला दिवसाकाठी फक्त पाचच मिनिटे मिळणार व तीही तुटकपणे सलग नाही, पण आशा सोडायची नाही, म्हणून एक मिनिट मिळाला तर काय आणि दहा - पंधरा मिनिटे मिळाली तर काय हे दोन्ही कार्यक्रम मनाशी आाखून ठेवले आहेत.
घराच्या दर्शनी भिंतीवर एक वर्षभराचे कॅलेंडर मी चिकटवून ठेवते, अशी इयर प्लॅनर्स बाजारात मिळतात. नाही तर आपले साधे मासिक कॅलेंडर असतेच. पाच मिनिटे - व्यायाम केला तर त्या दिवसावर खुण करायची. अशा त-हेने किमान एक चतुर्थांश तरी कॅलेंडर रंगलं तर ते वर्ष ‘यशस्वी’ म्हणायचं. (मात्र अयशस्वी वर्षाबद्दल निराशा बाळगायची नाही हा पहिला नियम) कॅलेंडरवरील खुणांमुळे फक्त एक ‘संख्याशास्त्र’ म्हणून बघायचे ! त्यामुळे आपण चांगले की वाईट अशी नीतीमूल्य त्याला चिकटवायची नाहीत !
सर्व आसनापैकी ताडासन हे मला खूप उपयुक्त वाटते. आहोत त्याच जागेवर उभ्यानेच हे आसन करायचे असते. यामध्ये हातपाय व संपूर्ण शरीर ताणले जाऊन सर्व अवयवांचा शीण जातो. याचा सर्वात जास्त फायदा पाठीच्या मणक्यांना होतो व आपल्या मेरूदंडामध्ये नाड्यांची वेगवेगळी जाळी व केंद्र असल्याने त्या सर्वांना फायदा होतो. लहान वयात उंची वाढवण्यासाठी व उतार वयात पाठीत व गुडघ्यात येणारा बाक न यावा म्हणून हे आसन खूप उपयोगी आहे.

आसन करताना वेळ मोजण्याआधी मी घड्याळ वापरत नाही. त्याऐवजी स्वत:च्या श्र्वासोच्छवास मोजायचा. आपले दहा श्र्वास अशी सुरूवात करून ते पन्नास ते शंभरपर्यंत वाढवत न्यायचे. याचे पण खूप फायदे आहेत. आपल्या शरीराचे सर्व व्यवहार त्यांच्या लयीने पार पडत असतात. हृदयाची लय वेगळी, पोटाची लय वेगळी, मेंदूची लय वेगळी. आपल्या सभोवतालच्या वातावरणाची लयसुद्घा वेगळी असते. या सर्वांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे आपल्या श्र्वासांची लय. आसने करताना झलकही यातून मिळते. साधारणपणे आपण मिनिटाला पंधरा वेळा श्र्वास घेतो. यावरून वेळेचा अंदाज येतोच.
जागच्या जागी कदमताल किंवा स्टॅटिक जॉगिंग किंवा दोरीवरच्या उड्या हा मी निवडलेला दुसरा प्रकार. पोट गच्च भरलेले असल्याची वेळ सोडून इतर वेळा कधीही शंभर उड्या मारायला दोन मिनिटे पुरतात. शिवाय कोणतीही पूर्व तयारी, साधने इत्यादी जुळवावी लागत नाहीत. फक्त मनाची तयारी असली की पुरे. ऍरोवॉटिक्सचे कोणीही शिक्षक म्हणतील की अशा जॉगिंगचा काही उपयोग नाही. त्याने शरीरातील कॅलरीज बर्न व्हायला सुरूवातसुद्घा होत नाही. मात्र आपणं जसं एखादं वाहन वापरायचं नसेल तेव्हा त्याला पाच मिनिटे रनिंग देऊन आणतो. जेणे करून बॅटरी, टायर्स, इंजिन हे वॉर्मअप होऊन सुस्थितीत राहतात. त्यासाठी माझं जॉगिंगचं तंत्र मला उपयोगी पडतं.
डोळ्यांसाठी मी तीन प्रकारच्या व्यायामाची निवड केली आहे. सुर्योदय किंवा सूर्यास्त समयी सूर्याचे बिंब लालसर असताना तो प्रकाश डोळ्यांवर घेणे. तसेच डोळ्यांची बाहुली संथ गोलाकार गतीने एकदा उजवीकडून डावीकडे तर एकदा डावीकडून उजवीकडे फिरवणे असे सर्व व्यायाम जमेल तसे करता येतात. डोळ्यांचा तिसरा व्यायाम म्हणजे पामिंग. तळहात डोळ्यांवर अशा त-हेने ठेवायचे की त्यातील मध्यभागाचा स्पर्श पापण्यांना व्हावा. हातावरील इतर सर्व उंचवट्यांचा दबाव डोळ्यांच्या अवतीभवती पडत असतो. उदाहरणार्थ गालफडांवर खालचे उंचवटे किंवा भुवयांवर वरील उंचवटे ! तळहातांच्या दोन्ही कडा देखील घट्ट ठेवायच्या जेणे करून बाहेरचा उजेड ज्यात येऊ नये. पापण्यांवर मात्र दाब पडू द्यायचा नाही. त्यांना फक्त तळहाताची ऊब द्यायची. आपली पापणी उघडता येणार नाही पण उभी आडवी फिरवता येईल अशी ही अवस्था असते. याही व्यायामासाठी 1-2 मिनिटे पुरतात. वेळ मोजायला पुन्हा श्र्वासाचे घड्याळ आहेच.

याशिवाय डोळ्यांच्या स्वास्थासाठी चांदीच्या भांड्यातील पाण्याने डोळे धुणे आणि योग्य प्रकारे आहार नियमन हे उपाय करणे चांगले ठरते.
ऑफिसात ज्यांना फक्त बैठं काम करावं लागतं त्यांना स्पॉण्डिलायटिसचा त्रास सुरू होतो. लांबचे दौरे करतांना गर्दीतून दुचाकी वाहन चालवताना खांदा, पाठ, मान आणि कंबर अशा ठिकाणी अनुक्रमे सुया टोचल्यासारखा त्रास होऊ लागतो. कार्यालयात एअर कंडिशनर असेल किंवा फार जोराने चालणारे पंखे असतील तरीही हा त्रास होतो. अशा वेळी किंवा हे होऊ नये म्हणून मानेचा एक चांगला व्यायाम आहे. हनुवटीला मानेच्या खड्डयात अडकवून 5-10 वेळा दीर्घ श्र्वसन करावे हा जालंधर बंधाच्या हा एकूण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. या नंतर मान व खालचे धड यांचा संपर्क न तुटू देता मान हळूहळू उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे फिरवून पुन्हा समोर आणायची. अशी 3-4 चक्रे पूर्ण झाल्यावर हीच क्रिया उलट्या दिशेने 3-4 वेळा करायची. यामध्ये आपली मान अनुक्रमे समोरील मानेचा खड्डा, नंतर उजवे कॉलर बोन, उजवा खांदा, पाठीचे उजवीकडील त्रिकोणी हाड, पाठीवरील कॉलरची जागा, डावीकडील त्रिकोणी हाड, डावा खांदा, डावे कॉलर बोन व पुन: समोरील मानेचा खड्डा असा प्रवास करीत असते. इडली पात्रातील वरवंठ्याचा दगड फिरताना जसा त्याचा व दगडी पातेल्याचा संपर्क तुटत नाही. तसेच मानेचा संपर्क तुटता कामा नये. हाही एक मिनिटात स्पाण्डिलायटिसच्या सुरूवातीला तोंड देऊ शकणारा व्यायाम आहे.
अर्धा ते एक मिनिट नळाच्या थंड पाण्याखाली डोक्याला हातांनी मालशि करणे. तसेच गरम पाण्याची आंघोळी असली तरीही शरीरावर अर्धा मिनिटं नळाचं थंड पाणी घेणे हा उत्साह व तरतरी टिकवण्याचा एक प्रत्ययकारी उपाय आहे. एक दोन मिनिटांच्या आवश्यक व्यायामांचे प्रकार इथेच संपत नाहीत. अशाच काही इतर आवश्यक व्यायामांची माहिती आपण पुढल्या लेखात पाहू या.

--- XXX ---

07- आहाराचे वेळापत्रक --Timetable for proper food habits

आहाराचे वेळापत्रक
मंगळवार दि. 11 मार्च, 1997 गावकरी लेखांक 7.
आपल्याला स्वत:पुरते प्राकृतिक आहाराचे प्रयोग करायचे असतील तेव्हा आहाराबाबत काही वेळापत्रक आखून आपण प्रचिती घेऊ शकतो. विशेषत: अजून आजार प्रत्यक्ष क्षालेला नाही त्याच वेळी प्राकृतिक आहाराचा दहा ते पंधरा दिवसांचा एखादा कोर्स करायचा असे ठरवून वेळापत्रक आखणे चांगले.

असा कोर्स कराताना त्याचे उद्देश लक्षात घेतले पाहिजे. आपल्या शरीरात रोज नव्याने जमा होणारा कचरा रोजच्या रोज बाहेर टाकायची सोय असली तरी प्रत्यक्षात तसे घडत नाही. रोजच्या कच-यापैकी काही कचरा शरीरात तसाच साठून राहतो व कुजून आणखी सुक्ष्म पण जास्त घातक स्वरुपात शरीर व्यापून राहतो. आपल्याला पंधरा दिवसांच्या प्रयोगामध्ये हा कचरा बाहेर काढायचा आहे. तो टप्प्या-टप्प्याने निघणारा उपाय सुरु केल्यानंतर कचरा आधी एकदम बाहेर निघून जाणार, उदाहरण द्यायचे तर ज्याप्रमाणे झाइूने आधी ऐंशी-नव्वद टक्के कचरा आपण साफ करतो व राहिलेला कचरा फडक्याने किंवा पाण्याने पुसून काढतो, तसा हा प्रकार आहे. यासाठी झाडूचे काम करतात उकडल्‌ेल्या भाज्या.

म्हणून दहा दिवसाच्या आहार-नियमन प्रयोगासाठी साखर व मसाले पूर्ण वर्ज्य करावेत. मीठही स्वयंपाकात न टाकता पानात वेगळे घेऊन ठेवावे, पण खाण्याचं शक्यतो टाळावे. मोड आलेले कडधान्य, साधे पातळ मुगाचे वरण, फुलके, उकडलेल्या भाज्या, लिंबू, अत्यंत पातळ ताक, काही कच्च्या भाजांची कोशिंबीर व साखरेची पूर्तता करण्यासाठी केळी, गुळ, खजूर, मध, मणुका किंवा जर्दाळू यांचा वापर करावा, ओला नारळ, शहाळयाचे पाणी, पालेभाज्यांचे सूप इत्यादी खाण्यात असावेत. तेलाऐवजी तूप वापरावे व म्हशीच्या दुधाऐवजी गाईच्या दुधातून केलेले तूप केव्हाही श्रेष्ठ. पण तेही माफकच असावे. ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे असावीत. चहा, कॉफी, सिगरेट, तंबाखू वर्ज्य करावी. सकाळी सुमारे अकरा व सायंकाळी पाच वाजता आहार घ्यावा. सकाळी व दुपारी लिंबूपाणी (साखर-मीठ न घालता व तसेच झेपल्यास गूळ घालून) किंवा साधे पातळ केलेले ताक घ्यावे. याप्रमाणे तीन दिवस करून पुढील तीन दिवस फक्त उकडलेल्या भाज्या किंवा मोंड आणून उकडलेले भाज्या किंवा मोड आणून उकडलेले कडधान्य , तसेच मोड आणून उकडलेली मेथाी (दोन-तीन चमचे) घ्यावी. पुढील तीन दिवस उपास व नंतर तीन दिवय फलाहार घ्यावा. उपास झेपल्यास फक्त फलाहार घ्यावा. शेवटचे तीन दिवस पुन: पहिल्या तीन दिवसांप्रमाणे आहार घ्यावा.

एकूण पंधरा दिवसात आहार कमीत कमी ठेवावा. या काळात कोठा साफ राहावा म्हणून रात्री झोपतांना पोटावर ओल्या मातीची किंवा ओल्या पाण्याची घडी ठेवणे, अति सौम्य रोचक उदा. त्रिफळा चूर्ण घेणे सकाळी चूळ न भरताच दोन-तीन पेले सावकाशीने पिणे, थोडा वेळ आसने करणे इत्यादी पूरक उपाय केल्याने चांगला फायदा होतो. वरीलप्रमाणे आहार घेत असताना प्रत्येक घासाची चव कशी लागते त्याची जास्तीत जास्त संवेदना जाणवली पाहिजे, असा प्रयत्न करावा. साधे पाणी पितांना देखील त्याची चव कशी लागते, ही संवेदना तीव्र करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जिभेवर हजारोंच्या संख्येने चव ओळखणारे टेस्टबड्स्‌ असतात. त्यांना चवीची जाण किंवा संवेदना जितकी चांगली होईल तितकी त्यांची कार्यक्षमता वाढेल. त्यांनी चवीबद्दलचा रिपोर्ट मेंदूकडे पाठवल्यानंतर मेंदूच्य आदेशावरून तोंडाच्य लाळग्रंथीत किंवा पोटात पाचक रस बनतात व त्यांनीच अन्नपचन होते. अन्नपचन जितके चांगले तितकी शरीराची गरज चांगली भागते व कचरा विसर्जनाचा
बोझाही कमी होतो. म्हणून चवीने जेवावे असे आपल्यात म्हणतात. पण त्याचा अर्थ मसालेदार जेवणे जेवावे असा नसून चव समजून घेत जेवावे असा आहे.

आपण खूपदा खूपसे पदार्थ किंवा चवी एकत्र करून खातो. तसेच भरपून मसाले वापरतो. त्यामुळे टेस्टब्डुसना आपले अन्न नेमके काय आहे हे ओळखायला व त्याप्रमाणे रस निर्मितीचे आदेश देण्याला त्रास होतो. परिणामी अन्न पचन अकार्यक्षम होते.

वरील प्रकारचे आहार नियोजन आपल्या घरीच करणे शक्य असते व त्यातूनही बराच फायदा होतो. मात्र यापेक्षा जास्त काटेकोरपणे, जास्त दिवस उपास इत्यादी करायचा असेल तर तत्काळ सल्ल्यासाठी एखादा तरी निसर्गोपचार तज्ज्ञ ओळखीचा असावा व उपलब्ध व्हावा. हे आहार नियोजन दोन महिन्यातून एकदा करून चालते व चांगला फायदा देऊन जाते.